4 जाने 2011

जनगणना 2011 व बौद्धांची लोकसंख्‍या

आपणांस माहितच आहे की भारतीय जनगणना 2010 चा पहिला टप्‍पा संपलेला असून त्‍यामध्‍ये कुटूंबांची गणना करण्‍यात आली होती. जनगणनेचा दूसरा व महत्‍वाचा टप्‍पा 9 फेब्रुवारी 2011 पासून आरंभ होत असून या टप्‍प्‍यात व्‍यक्तिंची गणना अर्थात जनगणना होत असून यामध्‍ये प्रत्‍येक व्‍यक्तिच्‍या धर्माची, जातींची तसेच भाषा आदींची नोंद करण्‍यात येणार आहे. सरकारी धोरणांसाठी आकडेवारी पुरविण्‍याचे काम जनगणनेच्‍या माध्‍यमातून होत असते. त्‍यामुळे सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक आदी सर्व क्षेत्रात जनगणना ही दिर्घकालिक प्रभाव पाडते, त्‍यामुळे भारतीय समाज जीवनात जनगणनेला असाधारण महत्‍व आहे.


भारत ही बुद्धभूमी असून बाबासाहेबांच्या मतानुसार सर्व भारतीय विशेष करून शुद्र (ओबीसी) आणि अतिशुद्र (एससी/एसटी) बौद्ध धर्माचे अनुयायी होते. असे असले तरी 2001च्‍या जनगणनेनुसार भारतात बौद्धांची लोकसंख्‍या 79,55207 एवढी नाममात्र दर्शविण्‍यात आलेली आहे. महाराष्‍ट्रात महार समाजाची लोकसंख्‍याच 81,60,596 एवढी आहे. तात्‍पर्य असे कि महार समाजाने धर्मांतर करुन बौद्ध धर्माचा स्‍वीकार केला असला तरी ही जनगणनेत बौद्धधर्माचा उल्‍लेख सर्वानी केला नाही. याचे सर्वज्ञात कारण म्‍हणजे आरक्षण जाण्‍याची भिती, हे होय. सरकार अनुसूचित जातीच्‍या लोकांना आरक्षण देत होते पण धर्मांतरीत बौद्धांना नाही. त्‍यामुळे आचार विचार व संस्‍काराने संपूर्णत: बौद्ध असलेल्‍या लाखों अनुसूचित जाती/जमातीच्‍या लोकांनी निदान शैक्षणिक आरक्षण मिळावे ह्या अनिवार्य आशेपायी आपली पूर्वीची जात कायम ठेवली पण त्‍यांनी धर्म ‘बौद्ध’ लिहीण्‍याचे टाळले. परिणामी महाराष्‍ट्रातील बौद्धांची लोकसंख्‍या कमी दिसून आली. अनुसूचित जाती/जमातींची अशीच कुचंबना संपूण भारतभर पहावयास मिळते. त्‍याचा परिणाम बौद्धांच्‍या लोकसंख्‍येवर झाल्‍याचे स्‍पष्‍टपणे जाणवते. त्‍यामुळे निश्चितपणे असे म्‍हणता येईल की 2001 मध्‍ये नोंदलेली भारतातील बौद्धांची 79,55, 207 ही लोकसंख्‍या जी एकूण लोकसंख्‍येच्‍या 0.8% आहे, वास्‍तविक नाही.



बंधुनो, ह्या जनगणनेच्‍या निमित्‍ताने आपला स्‍वाभिमान व धर्म जोपासण्‍याची सुवर्ण संधी आपणांस मिळत आहे. आरक्षण जाईल या भितीमुळे म्‍हणा पूर्वी जे झाले ते सर्व विसरुन येत्‍या जनगणनेत आपला धर्म ‘बौद्ध’ व जातीच्‍या रकान्‍यात (अनुसूचित जाती/जमाती असल्‍यास जी लागू असेल ती उदा. महार, चांभार) आपली जात लिहा. कारण, 1950 व 1990च्‍या संवैधानिक नियमांनुसार अनुसूचित जाती/जमातीचे लोक बौद्ध धर्माचे असू शकतात. त्‍यामुळे धर्म बौद्ध लिहील्‍यावर सुद्धा आपल्‍याला जातीचा उल्‍लेख करणे आवश्‍यक ठरते. तसे न केल्‍यास खुल्‍या वर्गात (Open Category) आपला समावेश होईल व अर्थातच आपले आरक्षण कमी होईल. राजकीय, शैक्षणिक तसेच सामाजिक आरक्षण (शासकीय योजना, नोक-या व आर्थिक तरतुदी) या सारख्‍या संवैधानिक अधिकार हे धर्मावर आधारित नसून जातीवर आधारीत आहेत. अशाप्रकारे जातीच्‍या उल्‍लेखाने बौद्ध धर्मात जातीवाद वाढेल किंवा बौद्ध धर्मात जातीच नाहीत, अशा भावनीक व सैद्धांतिक संभ्रमात राहणे हिताचे होणार नाही. केवळ जातीचा उल्‍लेख न केल्‍याने हिंदू, सिख, मुस्लिम व ख्रिस्‍ती धर्मांतून जातीवाद समाप्‍त झालाय का? त्‍यामुळे, केवळ जातीचा उल्‍लेख केल्‍याने जातीवाद वाढेल असे म्‍हणणे चुकीचे ठरते. बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्यानंतर दिनांक 15 ऑक्टोबर 1956 या दिवसी आरक्षणाच्या संदर्भात बाबासाहेब म्हणाले होते की, ‘माझ्या लोकांना आरक्षण कसे मिळेल, या साठी माझ्या पोतळीत अनेक उपाय आहेत.’ अर्थात बौद्ध धर्माच्या दिक्षेसह आरक्षण कसे कायम राहिल यासाठी ते जागरूक होते हे स्‍पष्‍ट होते. जातीव्‍यवस्‍था समाप्‍त करण्‍यासाठी ‘रोटी-बेटी व्‍यवहार, ब्राम्‍हणांनी रचलेल्‍या ग्रंथांची पवित्रता नष्‍ट करणे, शुद्रातिशुद्रांचे जीवनमान उंचावणे, त्‍यांचा स्‍वाभिमान जागविणे, त्‍यांना उच्‍च शिक्षणाची प्रेरणा देवून स्‍वावलंबी बनविणे’ हे उपाय बाबासाहेबांनी सांगितलेले आहेत. हे उपाय न केल्‍याने जातीवाद वाढेल. तेव्‍हा, फक्‍त जात लिहील्‍याने जातीवाद वाढेल असे म्‍हणण्‍यात काही अर्थ नाही. परंतु, अनुसूचित जाती व जमातीच्‍या यादींमध्‍ये केन्‍द्र व राज्‍य सरकारांनी सुधारणा केल्‍यास जातींच्‍या उल्‍लेखाची गरजच भासणार नाही.



2001च्‍या जनगणने प्रमाने भारता पालि बोलणा-यांची संख्‍या शुन्‍य आहे. पालिभाषेचे महत्‍व ओळखुन बाबासाहेबांनी पालि भाषेचा शब्‍दकोष तयार केला व संविधानात त्‍याची तरतुद केली. पालिभाषेच्‍या माध्‍यमातुन आरोग्‍यशास्‍त्र, मानसशास्‍त्र तसेच भगवान बुद्धांच्‍या शिकवणुकीचा अभ्‍यास करता येतो. आमच्‍या प्रत्‍येक शुभ कार्याचा नव्‍हे प्रत्‍येक दिवसाचा आरंभ पंचशिल त्रिसरणाने होत असतो. पंचशिल व त्रिसरणाच्‍या गाथा पालि भाषेत आहेत. केवळ महामंगलसुत्‍त, जयमंगलअठ्ठगाथा, धम्‍मपालनगाथा अशा अनेक पालि गाथा कित्‍येकांच्‍या तोंडपाठ असून आमची कित्‍येक पाल्‍ये शाळा/कॉलेजातून पालि भाषा शिकत आहेत. तरी या जनगणनेत भाषेच्‍या रकान्‍यात मातृभाषा किंवा अन्‍य भाषांमध्‍ये ‘पालि’ भाषा येते असा उल्‍लेख करणे आवश्‍यक आहे. पालि भाषेच्‍या अभ्‍यासकांनी व भन्‍ते यांनी पहिली भाषा व इतरांनी दुसरी किंवा तीसरी भाषा म्‍हणुन पालिभाषेची नोंद करावी. तसे झाल्‍यास सरकारी पातळीवर पालिभाषेची दखल घेतली जाईल.



तेव्‍हा समस्‍त बहुजनांना सामाजिक जाणीवेतुन एकच आग्रहाचे आवाहन करीत आहोत की 9 फेब्रुवारी 2011 मध्‍ये सुरू होणा-या जनगणनेच्‍या दूस-या टप्‍प्‍यामध्‍ये आपल्‍या विषयीची माहिती देतांना आपला धर्म ‘बौद्ध’ व जात (अनुसूचित जाती/जमाती नुसार जी लागू असेल ती) व मातृभाषा किंवा अन्‍य भाषेमध्‍ये पालि भाषेचा समावेश करावा.



जनगणना प्रगणकाने तशी नोंद केल्‍याची खात्री करा व इतरांना सुद्धा असाच मजकूर लिहायला सांगा. जेणे करुन, भारतातील बौद्धांची खरी संख्‍या दिसेल व त्‍या लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात सामाजिक, शैक्षणिक व राजकीय आरक्षण मिळेल. पर्यायाने बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्‍याचे स्‍वप्‍न काही अंशी पुर्ण होईल.



बाबासाहेबांचे स्‍पप्‍न पुर्ण करा! जनगणनेत धर्म ‘बौद्ध’ लिहा!!

मित्रांना, नातेवाईकांना, शेजा-यांना सांगा! नाही तर पुन्‍हा दहा वर्ष संधी नाही.

28 डिसें 2010

महापरिनिर्वाण दिवसाचे औचित्‍य

आंबेडकरी अनुयायांची गर्दी
6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. त्‍यांच्‍या स्‍मारकाला अभिवादन करण्‍यासाठी गेल्‍या 54 वर्षापासून महाराष्‍ट्रातीलच नव्‍हे तर देश विदेशातील लोक मुंबईच्‍या चैत्‍यभूमीवर येतात. लाखोंच्‍या संख्‍येने लोक इथे येतात, दर वर्षी गर्दीचा उच्‍चांक मोडला जातो. ह्या गर्दीची वैचारिक वर्गवारी चार गटात करता येईल अशी आहे. काही भीम सैनिक असतात काही आंबेडकरी अनुयायी असतात तर काही भक्‍त असतात. या शिवाय, ह्या गर्दीत चौथा एक वर्ग असतो तो केवळ हौसे साठी आलाय कि काय असे वाटते. राजकारण्‍यांन पासून ते अज्ञानी अशिक्षित किंवा अर्धशिक्षीत लोकांची प्रचंड गर्दी ... काही श्रीमंत, अति श्रीमंत तर काही फटे कंगाल... अशा ह्या गर्दीचे विविध चेहरे व रंग पाहायला मिळतात. ही प्रचंड गर्दी मुंग्‍यां सारखी शिस्‍तीत जरी असली तरी इतर समाजातील लोकांचे टोमणे एकांतात कानावर पडल्‍यावाचून राहत नाही. ‘आले मुंबई घाण करायला’, ‘कशाला येतात धडपडायला...’ इथ पासून ते ‘मला न बाई किळसच येते..नेमकी वर्किंग डे म्‍हणजे.. जाम त्रास असतो ह्या लोकांचा..तरी मी गेल्‍या वेळेस सुटी टाकून बसली होती घरी.. पण आता शेवटच्‍या महिण्‍यात सुटी सुद्धा बॅलंस नाही .. काय करणार?’ असे हे टोमणे बस मध्‍ये किंवा ट्रेनमध्‍ये हमखास ऐकायला मिळतात. सामान्‍य मुंबईकरांना दर मंगळवारी नियमितपणे सिद्धीविनायक मंदीरापुढे व मागे दोन्‍ही बाजूला होणारी गर्दी व त्‍यामुळे हेतुपूर्वक केलेली वाहतुक कोडी बद्दल कोणी चकार शब्‍द सुद्धा काढत नाही. काढला तर सिद्धीविनायक कोपेल की काय अशी एक भीती आणि भक्‍तीच्‍या नावाखाली धर्मांधांनी माजवलेली दूसरी भीती, वाटणा-या मुंबईकरांना मात्र 6 डिसेंबरची गर्दी ‘घाण’ वाटते.. पण त्‍यांचा सण छोटा त्रास मोठा अशी अवस्‍था वर्ष भर पहावयास मिळते त्‍याच कुणालाच काही वाटत नाही. दिवाळी म्‍हटली की चक्‍क महीनाभर ध्‍वनी व वायु प्रदूषण आलंच, कुणीच काही बोलत नाही. गणपती आला परत दहा दिवस रात्रंदिवस ध्‍वनी प्रदूषण, कोणीच काही बोलत नाही. त्‍यात प्रत्‍येक शहरात एक दिवसाचे, दिड दिवसाचे, तीन दिवसाचे, पाच दिवसाचे, सात दिवसाचे दहा दिवसाचे उठणारे गणपती प्रदूषणांशिवाय वाहतुक कोंडी करतात कुणीच काही बोलत नाही. वर्षातुन न जाणो कित्‍येक वेळा हिंदुंच्‍या धार्मीक सणांमुळे इतरांची कशी कोंडी होते हे जर सांगायला लागलो तर माझा ब्‍लॉग कमी पडेल.
महापालिकेने केलेली स्‍वच्‍छतागृहांची तयारी

मुंबई महापालिकेची तयारी चोख जरी असली तरी प्रसंशनिय मात्र नाही. शिवाजी पार्क वर प्रचंड धुळ त्‍यात खाण्‍या-पिण्‍याची सोय तर आहे. पण अशा धुळीत भिकारी सुद्धा जेवणार नाही अशी परिस्थिती असते. खाण पान देणा-या स्‍टॉल वर जेवण देण्‍याची चांगली व्‍यवस्‍था अजिबात नसते. एक ग्‍लास पाणी घ्‍यायच म्‍हटलं तर गुडघ्‍यापर्यंत चिखल अंगावर उडतो. जेवणाचे स्‍टॉल तर आहेत जेवणासाठी जागा कुठेच नाही. एवढ्या मोठ्या मैदानावर जेवणाची व खाण्‍यासाठी वेगळी व्‍यवस्‍था करता आली असती पण नाही, दर वर्षी तीच ती चुक महापालिका करीत आहे. जेवणांच्‍या स्‍टॉलला लागुनच इतर सामाजिक संस्‍थांचे स्‍टॉल असल्‍यामुळे उष्‍टे खरकटे थेट त्‍यांच्‍या स्‍टॉल मध्‍ये पडत होते. सामाजिक संस्‍थांच्‍या किंवा इतर कार्यालयांच्‍या स्‍टॉल शेजारीच ऑडिओ व्हिडीयो स्‍टॉलची गर्दी होती. लोकांची गर्दी, त्‍यांच आवाज त्‍या ह्या गाण्‍यांच्‍या व व्हिडीयोच्‍या स्‍टॉल मुळे वाढलेला प्रचंड गोधळ नकोसा होत होता. व्हिडीओची गाणी बघण्‍यासाठी स्‍टॉल पुढे झालेल्‍या गर्दीत आणखी चेंगरा-चेंगरी होत होती. त्‍यात लहान मुलांचे व म्‍हाता-यांचे हाल पाहवत नव्‍हते. व्‍यवसाय करण्‍यासाठी ह्या लोकांनी या दिवसाचं पावित्र्य घालवून दिलं, असच वाटत होतं. अशा ह्या प्रचंड गर्दीच्‍या गोंधळात आणखी एक गोंधळ होता तो म्‍हणजे सौंदर्य प्रसाधनाचे स्‍टॉल. बायकांच्‍या प्रचंड गर्दीत संध्‍याकाळचा वाढत चाललेला अंधार. शिवाजी पार्क वर अनेक स्‍टॉल अंधार किंवा एका दिव्‍यावर चालली होती. पुस्‍तकांची दुकाने दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहेत. अशा रितीने आम्‍ही या दिवसांचं स्‍वरुप बदलवून सामान्‍यांच्‍या वैचारीक प्रबोधनाला खीळ घालत आहोत.

चैत्‍यभूमीवरील आमचा स्‍टॉल



गरीब असलो तरी शिस्‍तबद्ध पद्धतिने, चांगला पोषाख करुन लोक येत आहेत, महामानवांच्‍या प्रतिमांना मान वंदना देत अभिवादन करीत आहेत व त्‍यानंतर वेगवेगळ्या विषयांच्‍या मंचावर आपले वैचारिक प्रबोधन करीत आहेत व जातांना पुस्‍तकांची खरेदी करीत आहेत. असं चित्र... असं स्‍वप्‍न गेली अनेक वर्ष आम्‍ही पाहत आहोत पण ते वास्‍तवात येत नाही. कोणतीही संस्‍था किंवा संगठना या साठी प्रयत्‍न करतांना दिसत सुद्धा नाहीत. गर्दी येते म्‍हणून नेते येतात, गर्दी येते म्‍हणून व्‍यावसायीक येतात. इतर जातात म्‍हणून आपण जायचं, जत्रेसारखी गर्दीची मजा घेवन घरी यायचं असंच चालु आहे. गावावरून आलेल्‍यातील एकाला मी फोन केला, ‘भाऊ तुम्‍ही कुठे आहाता?’ त्‍यावर तो म्‍हणाला कि, ‘आमची फाटा-फुट झाली.. तीन जण ‘जत्रीत’ आहेत बाकीची पाच लोकं जेवायच्‍या लायनित आहेत..’ हे वाक्‍य पुरेसं बोलकं आहे कि आम्‍ही महापरिनिर्वाण दिनाचे स्‍वरुप कसं बदलवित आहोत त्‍याचं. हा बदल नक्‍कीच सकारात्‍मक नाही याची आपणास सुद्धा खात्री पटली असेलच.



5डिसेंबर 2010 रोजी महापालिकेची स्‍वच्‍छता गृहे

असंच एक आणखी बोलकं उदाहरण आहे. दुस-या दिवसीची संध्‍याकाळ. गर्दी आता परतीला लागली होती. पंचवटी एक्‍सप्रेसमध्‍ये काही लोक माझ्या शेजारी उभे राहून प्रवास करीत होते. त्‍यांच्‍या परस्‍पर चाललेल्‍या संवादामध्‍ये एक तरुण म्‍हणाला, ‘बाबामुळे आज मुंबई दिसली बे... बस झालं आणखीन काय पायजे.’ न रहावून मी म्‍हणालो, ‘मुंबई पाहाण्‍यासाठी बाबा कशाले पाह्यजे बे.. अबे सादा भिकारीबी मुंबई पाह्यते..बाबाची काई गरज आहे..; शिकला की अमेरिका बी दिसते... नाय काय?’ बहुतेक त्‍याला माझं बोलणं आवडलं नसाव.. तो भिरभिरत्‍या नजरेनं माझ्याकडे बघत राहीला.. कल्‍याणला मी उतरलो.. तो तसाच गाडीतल्‍या गर्दीत नाहीसा झाला. 


-अशोक वानखडे 6 डिसेंबर 2010
स्‍टॉल वर येणारे अनुयायी



30 एप्रि 2010

सु-वर्ण महोत्‍सव महाराष्‍ट्राचा

महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. राज्‍य भर सूवर्णमहोत्‍सवी कार्यक्रमांची धुम चालली आहे. हे कार्यक्रम जसे शास‍कीय पातळीवर होत आहेत तसेच ते राजकीय पक्षांपासून ते वैयक्तिक पातळीवर ही चिरीमिरीच्‍या रुपाने होत आहेत. अशा कार्यक्रमांचे एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे महाराष्‍ट्राचा महीमा त्‍याची प्रगती यांचे गुणगाण हे होय. कोणत्‍याही मुद्याला जशा दोन बाजू असतात, अगदी तशाच, महाराष्‍ट्राच्‍या प्रगतिच्‍या मुद्याला सुद्धा दोन बाजू आहेत. एक तर, प्रत्‍येक क्षेत्रात राज्‍याने प्रगति केली असे ठणकावून सांगणारी एक बाजू व दूसरी बाजू म्‍हणजे पाहिजे तसी प्रगती झालीच नाही जी काही दिसत आहे ती शासकीय किंवा राजकीय प्रगती नव्‍हे असे सांगणारी बाजू. पण खरचं, गेल्‍या पन्‍नास वर्षात आम्‍ही काय साध्‍य केलंय? या प्रश्‍नांचं प्रामाणिक उत्‍तर देणं सोप नाही.



विजेचा प्रश्‍न, पिण्‍याच्‍या पाण्‍याचा भिषण प्रश्‍न, हजारो शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या, मागे राहीलेल्‍या त्‍यांच्‍या परिवारातील सदस्‍यांच्‍या दुदर्शा, सीमाप्रश्‍नांवर सतत भाजली जाणारी राजकीय पोळी, नक्षलवाद, जातीयवादाचा सतत चढत जाणारा बाण, अंधश्रद्धा व बुवाबाजीचे पेव



जुने प्रश्‍न: जातीवाद, नक्षलवाद, सीमा प्रश्‍न, नवे प्रश्‍न: शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या, वीज टंचाई, पिण्‍याचे पाणी, नक्षलवादाचे नवे रुप, जा‍तिवादाचे भिषण स्‍वरुप, प्रादेशिक प्रगतिची गति, विदर्भ राज्‍य,

भविष्‍यातील प्रश्‍न:, विदर्भ राज्‍य, मराठवाडा, खानदेश, पाणी, वीज

उत्‍तरे आहेत पण ती देणारे नाहीत.

25 फेब्रु 2010

हिरवे भगवे रक्‍त

विधेयकात सारे रुसवे फुगवे निघाले ।
एका कडेत डावे दूस-या उजवे निघाले॥

रस्त्यात सांडले तरीही दोन पाट निघाले
एक रक्त हिरवे दूसरे भगवे निघाले॥

कोण हे गटागटात आ*** निघाले।
बाप सूर्य आमुचा हे काजवे निघाले।।

लकाकते लुचपतींची हप्तेवार वसूली
माझे खिसे फाटके इमान फसवे निघाले॥

जर्तारी योजनांच्या झाल्या घोषणा सरकारी
हरती ससे शर्यती पुढे कासवे निघाले।

अरे थडग्यांच्या वस्तीने शेवटी कौल दिला
पोटा साठी पाखरांचे दूर हे थवे निघाले॥

मी काय बरे अता देवू तुला माझ्या सुखा
दाटून उसासे गळी आसवासवे निघाले।

गालावरी क्षणेक थांबले थेंब पापणीचे
ते नजर निरोपाची घेत पारवे निघाले।

मिटल्या जरी पापण्या तेव्हा प्रतिक्षेत तुझ्या
कोंब थिजल्या डोळ्यात माझ्या हिरवे निघाले॥

-अशोक वानखडे

9 फेब्रु 2010

पायरेसी

पायरेसी (Piracy) अर्थात साहित्यिक चोरी. हल्ली हा शब्दज बॉलीवुडच्या् चित्रपटांच्या बाबतीत ब-याचदा ऐकायला मिळतो. त्यामुळे चित्रपटांची अनधिकृत चोरी असा पायरेसी या शब्दाचा अर्थ रुढ झाला आहे. मुळात मुद्दा आहे तो चित्रपटांच्यात अशा प्रकारे होणा-या चोरीचा. मुंबईतील प्रत्येक स्टेशनच्या परिसरात किंवा कुठे ही बाजारात अगदी सहज पणे नव्या को-या चित्रपटांच्याच सीडी कमी किंमतीत मिळतात, ज्यायमुळे टीवीला कंटाळलेला सामान्यं प्रेक्षक कमी किमतीत आपले मनोरंजन करुन घेतो.


बॉलीवुडच्या चित्रपटवाल्यांनी व हल्ली चांगले दिवस आले असे सांगणा-या मराठी चित्रपटवाल्यांसह मराठी चित्रपट महामंडळाने अशा पायरेसी विरुद्ध जण जागृती करण्याचे व पायरसीला आळा घालण्यांचे परत एकदा मनावर घेतले आहे. असे ही सांगण्यादत येत आहे कि महाराष्ट्र राज्याने अशा पायरेसी विरुद्ध कायदा सुद्धा केला आहे म्हणे, यात तथ्ये किती आहे ते माहीत नाही. असे असले तरी, सामान्‍यात: पायरेसी बेकायदेशीर वाटते किंवा ती बेकायदेशीर आहे असे भासविले तरी जाते. आजच्यात काळात अशी पायरेसी खरचं बेकायदेशीर असावी का?

चित्रपटात काम करणा-या नट-नट्यांना लाखो करोडो रुपये द्यायचे. देशो-देशी चित्रिकरण करायचे, भाई-डॉनचे लागेबांधे, प्रचंड काळा पैसा टाकून बनविलेले, नको तेवढा अवाढव्य प्रचार प्रसार करुन चित्रपटाचे निर्मिती मूल्य वाढविलेले, असे करोडोचे बजट असलेले भिकार चित्रपट भारतीयांच्या माथी मारायचे, आणि त्यापतून प्रचंड पैसा कमवायचा, असे हे दृष्ट चक्र आहे. अशा ह्या चक्रामध्ये केवळ पिचण्यारसाठी प्रेक्षकांना थियटरमध्ये चित्रपट पाहण्यास सांगणे हाच गुन्हा नाही का?

मराठी चित्रपटांची तर कथाच वेगळी, मराठी चित्रपटवाले चिरीमिरी चित्रपट काढतात, चित्रपट महामंडळाकडून लाखोचे अनुदान लाटतात, आणि तोंड वर करुन सांगतात कि चित्रपटांमुळे प्रचंड जन-जागृती होते, समाज सुधारणा होते, भाषेचा विकास होतो.. अमूक होते टमूक होते... तरी बरे, आता सर्व मराठी चित्रपटवाले झी (मराठी चॅनेल) च्या छत्रछायेखाली एकवटलेले आहेत. दणादण चित्रपट काढत आहेत, नाही चालले तर लगेच झी वर दाखवायला मोकळे, वर असा प्रचार करीत आहेत कि आता दिवस चांगले आले आहेत. एकूण काय? तर पायरेटेड सीडी घेवू नका, चित्रपट, थियटरमध्ये जावून बघा, म्हणजे, तुमचा खिसा खाली होईल, कमीशन मल्टीतप्लेक्स वाल्या‍लाही मिळेल, व वरकमाईचे हिस्सेरदार आम्ही सुद्धा होवू व परत चित्रपट काढू आणि परत तुम्हाला लुटत राहू.

शेवटी आजच्या् आयटी व उच्च तंत्रज्ञानाच्या काळात जिथे घरात सुद्धा होम थियटर, फॅल्ट स्क्रिन वर किंवा पीसी वर तशीच मजा/मनोरंजन करता येते तेव्हा् पायरसीला मान्यता देणेच उचित ठरत नाही का? जिथे केवळ 50 रुपयाच्‍या सीडी मध्येज 6 चित्रपट घरात बसून कुटूंबासह पाहता येतात तिथे थियटरमध्ये चित्रपट पहायचा म्हणजे एका कुटूंबाला सहज 500 रुपये तरी मोजावे लागतात, याशिवाय वेळ व जाण्या येण्याचे हेलपाटे लागतात ते वेगळेच. सामान्यांना थियटरमध्ये जावून पैसे मोजण्यास का बाध्यत करायचे, हेच कळत नाही?

तुम्हायला कळतयं?